बंदुका झाडल्या... रक्त सांडले... पण मांगरूळची माती झुकली नाही!
बंदुका झाडल्या... रक्त सांडले... पण मांगरूळची माती झुकली नाही! मनोजकुमार मस्के -- बिळाशी बंडाच्या रणसंग्रामात भारतमातेसाठी हुतात्मा झाले धोंडी संतू कुंभार आणि शंकर भाऊ चांभार; स्वातंत्र्याच्या इतिहासातील हा रक्तरंजित अध्याय आजही काळजात धडकी भरवतो! शिराळा तालुक्याच्या मातीत स्वातंत्र्याची अशी एक ठिणगी पेटली होती, जिच्या ज्वाळांनी ब्रिटिश सत्तेच्या छातीत धडकी भरली होती. ही कहाणी आहे बिळाशीच्या बंडाची... आणि त्या बंडाच्या ज्वालेत स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या मांगरूळच्या दोन नरवीरांची! भारत पारतंत्र्यात होता. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्याची आस धगधगत होती. महात्मा गांधींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध सत्याग्रहाची हाक दिली. समुद्रकिनारी भागात मिठाचा सत्याग्रह आणि इतर भागात जंगल सत्याग्रहाची चळवळ उभी राहिली. अनेक ठिकाणी ब्रिटिशांनी पोलिसी बळाचा वापर करून आंदोलने चिरडली. पण बिळाशीमध्ये काहीतरी वेगळे घडत होते. येथे आंदोलन काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या हातात राहिले नव्हते. बिळाशीच्या सामान्य जनतेनेच स्वातंत्र्यलढ्याची मशाल आपल्या हातात घेतली होती. गरीब होते... अशिक्षित होत...