शिवाजी ज्ञानू सपकाळ (तात्या
*भावपूर्ण श्रद्धांजली*
*शिवाजी ज्ञानू सपकाळ (तात्या)*
(वय ८३)
*निधन: दिनांक २८ ऑगस्ट २०२५, सायं. ६.३० वा*.
तात्या गेले. हे शब्द लिहताना मन सुन्न होतंय. कारण तात्या हे फक्त एका कुटुंबाचे नव्हते, ते संपूर्ण गावाचे होते – हसरे, खेळकर, सगळ्यांना आपलेसे करणारे.
रिळे गावातील शिवाजी ज्ञानू सपकाळ, म्हणजेच सर्वांच्या लाडक्या तात्यांचं आज सायंकाळी अचानक झोपेतच निधन झालं. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण मागे एक मोठा आणि प्रेमळ परिवार ठेवून गेले – पत्नी तानुबाई, मुलगा संजय, मुली सुनिता व स्मिता, सून, नातवंडं, जावई, लेकींची मुलं, आणि असंख्य आप्तस्वकीय, गावकरी व मित्र.
तात्यांचा जीवनप्रवास संघर्षमय, पण प्रेरणादायी होता. मुंबईत गिरणी कामगार म्हणून तब्बल ३० वर्ष प्रामाणिकपणे काम करून कुटुंब उभं केलं. मोठ्या मुलीचं लग्न करून, त्यांनी गावाकडे परत येऊन शेतीची जबाबदारी घेतली. कष्ट, निष्ठा आणि समाधान यांनी त्यांच्या आयुष्याची ओळख निर्माण झाली.
ते नेहमी चेहऱ्यावर हसू असलेले, लहान मुलांसारखे मनाचे. गेली ३ वर्ष अंथरुणावर होते, अधूनमधून वाकराच्या आधाराने थोडं चालायचे, पण त्यांचं हास्य कधीच विरलं नाही.
विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांचा मुलगा संजय यांचं वडिलांवर असलेलं नितांत प्रेम. नेहमी व्यवसायाच्या व्यापात असूनही, तात्यांची सेवा, देखभाल, फिरवून आणणं, लाड करणं – यामध्ये त्याने कधीच कसूर केली नाही. आणि जणू नियतीचं अद्भुत नियोजन म्हणा, की ज्या दिवशी तात्यांचं निधन झालं, त्या दिवशी संजय अचानक गावी होता. निघायच्या काही वेळ आधीच, तात्यांची तब्येत बिघडली, फोन आला, आणि संजय धावत आला. बापाच्या शेवटच्या श्वासावेळी मुलगा जवळ असणं – हे खरंच पुण्यकर्मच.
तात्यांच्या जाण्याने गावाने एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व गमावलं आहे. त्यांचं हास्य, त्यांच्या आठवणी, त्यांचा मोकळेपणा – सगळं आज काळजाला भिडतंय.
तात्या, तुमचं आयुष्य आम्हाला माणूसपण शिकवून गेलं.
तुमच्या जाण्याने अनेकांच्या मनाला वेदना झाल्या आहेत.
तुमचं स्मरण सदैव आमच्या हृदयात राहील.
*भावपूर्ण श्रद्धांजली*
🌹💐🕯️
Comments
Post a Comment