*भावपूर्ण श्रद्धांजली – संजय गणपती पाटील (संजू दादा)*


मनोजकुमार मस्के, मांगरूळ

"*आठवणी कधीच मरत नाहीत, त्या मनात घर करून राहतात... आणि माणूस जातो तेव्हा फक्त शरीर जातं, आठवणींमध्ये तो कायमच जिवंत राहतो*."

आज संजू दादा आपल्याला सोडून जाऊन एक संपूर्ण वर्ष लोटलंय… पण खरं सांगायचं तर, तुमची आठवण, तुमचं हास्य, तुमचं मार्गदर्शन, तुमचं माणुसपण — हे सगळं अजूनही ताजंच वाटतं… अगदी कालच घडलंय असं.

नेहमी हसतमुख असणारा, प्रत्येकाशी आपुलकीनं वागणारा, कोणत्याही अडचणीत मार्गदर्शन करणारा, "भविष्यासाठी काहीतरी करून ठेवावं..." असा सल्ला देणारा — हा आपला संजू दादा अचानक गेल्याचं ऐकून काळीज थरथरलं.

एलआयसीच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या भविष्याची आखणी करणारा, अनेक घरांना आर्थिक साक्षरतेची दिशा दाखवणारा माणूस... स्वतः मात्र इतक्या अचानकपणे कोणालाही काही न सांगता निघून जाईल असं वाटलंच नव्हतं.

दादा, तुमच्या जाण्यानं एक मोठा आधारच निखळला. पत्नी, लहान मुलं, कुटुंबीय — सगळे अजूनही त्या धक्क्यातून सावरले नाहीत. मित्रमंडळी, स्नेही, शेजारी — आजही तुझी वाट पाहतायत. तुझं ते हसणं, मनमोकळं बोलणं, कुठल्याही गोष्टीसाठी पुढाकार घेणं — सगळ्यांची आठवण रोज येते.

आणि हो… तू गेल्याच्या चार दिवस आधी आपली चहा सोबत घेतलेली ती गप्पांची मैफल… आणि त्याच्यानंतरच्या दिवशी मी दुकानावर जाताना तू दारात उभा… मी दिलेला हॉर्न… आणि तुझा तो हसतमुख चेहरा — त्या आठवणी अजूनही मनात कोरल्या गेल्या आहेत.

दादा, तुझं जाणं इतकं अनपेक्षित होतं की शब्दच हरवले. आम्हाला वेळ मिळालाच नाही की तुला काही सांगावं, पकडून ठेवावं… फक्त एक हळवी आठवण मागे ठेवून तू निघून गेलास — कायमचा.

मृत्यू ही जीवनाची अपरिहार्य सत्यता आहे, हे मान्य आहे. पण तुझ्यासारख्या माणसाला इतक्या लवकर घेऊन जाईल, असं मात्र कोणाच्याही मनात आलं नव्हतं. अजून खूप काही करायचं होतं… तुझ्या स्वप्नांची पूर्णता बघायची होती… पण नियतीचं नियोजन वेगळंच होतं.

आज संपूर्ण मित्रपरिवार, नातेवाईक, कुटुंबीय – सगळेजण तुझ्यासाठी डोळे पाणावून बसले आहेत. फक्त एकच इच्छा आहे — कधीतरी त्या आठवणींच्या वाटेवर तू पुन्हा भेटावास… एकदा फक्त…!

"*शब्द अपुरे पडतात, भावना ओसंडून वाहतात.
तू नसताना ही, तू इथेच आहेस असं वाटतं.
तुझ्या आठवणींना आम्ही कायम जपून ठेवू…
संजू दादा, तुझ्या स्मृतींना आमची शतशः श्रद्धांजली*."
























Comments

Popular posts from this blog

अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

शिरशी गावच्या लोकनियुक्त पहिल्या सरपंच – सौ. स्मिताताई बापूराव भोसले

*शिराळा उत्तरच्या मातीत दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते फक्त निवडणूक नव्हतं*… *तो विश्वासाचा, नात्याचा आणि घराण्याच्या संस्कारांचा विजय होता*.