देता, देता इतुके द्यावे ...देणाºयाने ‘रामशेठ’ व्हावे...
मधुकर भावे
आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. २७ डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे.
५0 वर्षापूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले पण राजकारण अंगाला चिकटवून न घेतलेले, व्यवसायात सचोेटीने आर्थिक यश मिळवलेले पण पाय जमिनीवर असलेले... रामशेठ ठाकूर यांनी ही इमारत ‘रयत’ला बांधून दिली आहे. त्यासाठी ७ कोटी ४0 लाख रुपये त्यांनी खर्च केले आहेत. आनंदाने केलेले आहेत. जे केले त्याचे त्यांना फार समाधान आहे. अशी थोडी माणसं असतात, जी समाजाकरिता जगतात. समाजाकरीता केलेल्या कामात आनंद मानतात. रामशेठ त्यामधले आहेत. त्यांना घरातील सर्व कुटुंबियांचीही तेवढीच साथ आहे.
महाराष्ट्राचं मोठेपण नेमकं कशात आहे? असा प्रश्न माझ्या मनात हे लिहीताना आला आणि त्याच उत्तरही लगेच समोर आलं. महाराष्ट्राच मोठेपण ‘महाराष्ट्र’ या नावातच आहे. हे राज्य खरच महान आहे. हे एकमेव राज्य असं आहे, ज्याच्या शब्दात ‘राष्ट्र’ही आहे आणि या महानतेची सुरुवात ‘रयत’मध्ये आहे. या शब्दाचा पहिला उच्चार या जगातला सर्वात मोठा राजा... जो रयतेचा राजा होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. सिंहासनावर बसलेला पण रयतेसाठी बसलेला, असा तो राजा होता. तीच महाराष्ट्राची परंपरा. रयतेला मोठं मानणारी, पुरोगामीत्वाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती सुरु केली. छत्रपती शाहू महाराज यांनी पुढे ती चालवली. त्याचा सामाजिक अर्थ महात्मा फुले, भीमराव ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर, टिळक, आगरकर यांनी महाराष्ट्राला सांगितला. त्यात राजकीय आणि सामाजिक परंपरा आली. त्यामुळेच या महाराष्ट्रात सत्तेच्या पदावर बसलेलेच मोठे, अस न मानता, समाजासाठी सर्वस्व झोकून काम करणारे आदरणीय ठरले, वंदनीय ठरले. त्यात विनोबा होते. पंजाबराव देशमुख होते, स्वामी रामानंद तीर्थ होते, शिवाजीराव पटवर्धन होते, बाबा आमटेही होते आणि कर्मवीर भाउरावही होते. ही परंपरा यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि आता शरद पवार . इथपर्यंत रयतेची ही परंपरा सुरु आहे. महाराष्ट्र त्यात अग्रभागी आहे.
त्यामुळेच सत्तेच्या पदापेक्षा सामाजिक काम करणाºया संस्थांची पदं या नेत्यांनी धन्य मानली. सहज आठवलं... महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणसाहेब १९६१ साली रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. त्यादिवशी त्यांचे डोळे डबडबले होते. भाषण‘ंमी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, त्यादिवशी मला जेवढा आनंद झाला नव्हता त्यापेक्षा कितीतरी पट मला आज आनंद वाटतो आहे. कारण, कर्मवीर आण्णांनी एक-एक रुपया जमा करुन ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवण्यासाठी जिवाचा आटापिटा केलेला आहे. त्या संस्थेचा मी अध्यक्ष झालो आहे. अण्णांच्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिकु शकली. ही रयतेची मुलं आहेत आणि ती आता जगाच्या स्पर्धेत उभी आहेत. तेव्हा हे पद मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं आहे.’...
आज यशवंतरावांच ते भाषण आठवत आहेत. पदावर बसलेली माणसं मोठी आहेतच त्यात यशवंतरावही आहेत, वसंतदादा आहेत, शरदराव आहेत, पण ती माणसे जेव्हा पदावर नव्हती, तेव्हाही मोठीच होती आणि आजही शरदराव पवार, थेट सत्तेच्या पदावर नसताना मोठेच आहेत. महाराष्ट्र हे नाव त्यामुळेच सार्थ होते आणि त्या नावातला ‘राष्ट्र’ हा शब्द अधिक मोठा होतो.
आज हे सर्व सांगण्याच कारण रामशेठ ठाकूर यांनी साताºयात रयत शिक्षण संस्थेला बांधून दिलेली इमारत, त्यासाठी खर्च केलेले
७ कोटी ४0 लाख. ५0 वर्षापूर्वी २५0 रुपये पगारावरचा एक शिक्षक, व्यवसायातील मोठ्या यशानंतर सामाजिक जाणीवा कायम ठेवतो. आपल साधेपण जपतो. नाव ‘रामशेठ’ असलं तरी, वागण्यात ‘शेठ’ कुठे दिसत नाही. पायात साधी चप्पल आहे. पाय आणि विचार जमिनीवर आहेत, सहज सांगतात... ‘मी काय घेवून आलो होतो, काय घेवून जाणार आहे?...’ आत्मज्ञानाची ही भाषा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत सगळ्याच संतांची याच आत्मज्ञानाच्या भाषेने त्यांच्या मोठेपणाची सुरुवात झाली होती. गोरा कुंभार असच म्हणाला होता... ‘मी एवढी मडकी बनवतो, पण माझ मडक कच्च की पक्क...’ सावताही असच म्हणाला... ‘मी बागेतले तण उपटतो, पण माझ्या मनातील अविचाराचे तण मी उपटतो का?’... मी रामशेठशी ही तुलना करत नाही. पण, एका शिक्षकाने कष्टाने उभ्या केलेल्या व्यवसायातून समाजाकरीता कोट्यावधी रुपये हसत, आनंदाने द्यावेत आणि स्वत:ला धन्य मानावं. याला आत्मज्ञान आणि आत्मभान या शब्दाखेरीज काय म्हणता येईल?
५0 वर्षापूर्वी महिन्याला २५0 रुपये पगार घेणारा शिक्षक, व्यवसायात उतरुन १0 हजार रुपये पणाला लावतो, त्यात दोन हजार रुपये मिळवतो. इथून सुरुवात होते. समाजाला विसरत नाही आणि बघता-बघता व्यवसायातला यशाबारोबर शिक्षणसंस्था उभ्या करतो... पनवेलचे सी.के.टी महाविद्यालय असो, खारघरचे महाविद्यालय असो, उलव्याची नव्यांने बांधलेली शकुंतला महाविद्यालयाची प्रचंड इमारत असो.... लाखो रुपये किमतींच उलव्यातला स्वत:च्या मालकीच मैदान अद्यावत करुन ते मैदान रामशेठ तरुण मुलांना खेळायला उपलब्ध करुन देतात. तिथे जावून उभे राहतात. १00 झाडं लावून घेतात. मुलांना खेळायला सामान देण्यापासून सगळी मदत करतात... एक-एक दिवस रामशेठसोबत काढला, की त्यांच्या जीवनशैलीचे आत्मभान जागे झालेले असे अनेक पैलु समोर येतात. घरी पोहोचतात तेव्हा घर भरलेलं असत, गर्दी असते, अनेक पालक बसलेले असतात. ‘ंमुलांची फी माफ करुन द्या’ म्हणतात. रामशेठ किती मुलांच्या फीज माफ करतात, याचा हिशोब नाही.
अशा किती शिक्षण संस्था त्यांनी उभ्या केल्या. सर्व जातीधर्माची मुल- मुली शिकताहेत आणि रामशेठ त्यात खूष आहेत. ही खुशी, हा आनंद हेच आत्मभान आहे. त्यांनी ठरवलं असतं तर या देशातल्या सगळ्यात महागड्या असलेल्या मर्सिडीस, बी.एम.डब्ल्यू गाड्यांंची ऐजन्सी घेवून, पनवेल, नवी मुंबईत शोरुम उघडून लाखो रुपये ते कमवू शकले असते. त्यांचा आनंद पैसे कमविण्यात नाही. जे मिळवले ते चांगल्या कामासाठी वाटण्यात आहे. या सामाजिक आनंदात ते खूश आहेत. राजकारणात ते फार रमले नाहीत, रमणारही नाहीत. दोनदा खासदार झाले, लोकसभेत पोहोचले. एकदा दि.बा.पाटील यांना पराभूत करुन, आणि बॅ.अंतुले याना पराभूत करुन पण त्यांच्याविषयीचा अत्यंतिक आदर त्यांच्या मनात आजही आहे. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.ंच नाव द्यावे, यासाठी लाखोंच्या मोर्चात रामशेठच आघाडीवर होते. १९९९ साली वाजपेयींच सरकार एका मतानं पडलं, ते मतं रामशेठ यांचच होतं. त्यांनी ते मत सरकारच्या बाजूने द्यावं म्हणून, त्यांना केंद्रीय मंत्रीपद आणि अजून काय काय कबूल केलं होतं... पण रामशेठ तत्वाचा माणूस आहे. पदाची त्यांना हाव नाही, त्यामुळेच ८0 टक्के समाजकारण आणि २0 टक्के राजकारण ही त्यांची भूमिका आहे, त्यामुळे या कृतज्ञ नेत्याने रयतला साताºयात कॉलेजसाठी जागा कमी पडते आहे, असं दिसल्यावर स्वत: इमारत बांधून दिली. रामशेठ यांच्या या उदारपणाला तेवढाच न्याय रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल ने दिला. रामशेठच्या ध्यानी-मनी नसताना या इमारतीला ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ हे नाव द्यायचा ठराव रयतचे अध्यक्ष शरद पवार यांनीच मांडला. डॉ. अनिल पाटील म्हणाले.. ‘आमच्या मनाप्रमाणे झालं..’ रामशेठ तयार नव्हते. ते प्रसिध्दीसाठी काही करत नाहीत, तो त्यांचा स्वभाव नाही.
... सहज आठवण झाली.. रामशेठच्या जन्मगावी गेलो होतो. गव्हाणखाडी.. उलव्याचा समुद्र जिथे सुरु होतो ते गाव. उधाण आलं की, रामशेठच्या घरापर्यंत पाणी यायचं. त्या गावातल्या छोट्या घरात रामशेठचा जन्म झाला. आज ते छोट घर त्यांनी तसच ठेवलं आहे. आईवडीलांचा भव्य फोटो लावला आहे. जुन्या घरात आणि नव्या घरातसुध्दा. त्या जुन्या घरात पाचव्यावर्षी आईला चुलीच्या जळण्यासाठी लाकड फोडून देण्याच काम राम करत होता. आई त्याच्या हातात पाटी-पेन्सिल देत होती. आज ६५ वर्षांनंतर रामचा रामशेठ झाला. हजारो मातांच्या मुलांना या रामशेठने शिक्षणासाठी पूर्ण इमारत बांधून दिली आहे, तीसुध्दा साताºयात.
आई-वडील, सासरे जनार्दन भगत यांचे संस्कार हे पुरोगामी संस्कार होते. त्याच संस्काराने रामशेठ मोठे होत गेले. पवारसाहेबांनी त्यांना नेमकं हेरलं आणि रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर घेतलं. पवारसाहेब आज ४0 संस्थांचे अध्यक्ष आहेत. आणि या सर्व संस्थांच पवारसाहेबांनी ‘संस्थान’ होवू दिलेलं नाही. कारण प्रत्येक संस्थेत रामशेठसारखी समर्पणाने काम करणारी माणसं आहेत. एक उदाहरण सांगून थांबतो.
२0 वर्षापूर्वीची गोष्ट. रयतचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे होते. संगणकीय युग सुरु झालं होतं. रयतच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयात संगणक शिक्षण देणे गरजेच होतं. विवेक सावंताकडून रावसाहेबांनी खर्चाचा प्रस्ताव घेतला. १२ कोटी खर्च होता. पवारसाहेबांना प्रस्ताव सादर केला. पवारसाहेबांनी बैठक बोलावली. १२ लोकांना बोलावलं. बैठक सुरु झाली, चहा मागवला.. त्यात ५ मिनीट गेली. राहीलेल्या ७ मिनीटात १२ जणांना सांगितलं... ‘तुम्ही एक-एक कोटी रुपये द्या.. सुरुवात रामशेठपासून झाली, मग पतंगराव कदम, ७ मिनीटात १२ कोटी जमले...’ अशी ही कर्मवीरांची रयत शिक्षण संस्था आज देशातली सगळ्यात मोठी शिक्षण संस्था आहे. साडेपाच लाख विद्यार्थी शिकत आहेत, १५ हजार प्राध्यापक आहेत.श्री. अनिल पाटील कार्याध्यक्ष आहेत, ते कर्मवीरांचे नातू. त्या शिक्षण संस्थेत रामशेठ शिकले, ते ॠण विसरले नाहीत, ॠण न विसरणारे असे किती लोक असतील?, अशा या रामशेठच्या कर्तृत्वावर काय लिहावं? त्यांच्या या कामापुढे सत्तेची पदं खूप छोटी वाटतात, रामशेठ मोठे वाटतात. पवारसाहेबांना अशी माणसं बरोबर माहिती आहेत. पवारसाहेबांएवढा मोठा माणूस देशात आहे तरी कोण? पदावर बसलेला माणूस मोठा नसतो, पदावर नसतानाही माणसं मोठी असतात. रामशेठ तुमच्या अभिनंदनाला शब्द कमी पडतायतं.... तुम्ही कोणत्याच शब्दात मावत नाही... तुमच्यासाठी एकच शब्द आहे. ...
‘रामशेठ’
तुमच्या नावात ‘राम’ आहे आणि ‘शेठ’ शब्दातला उद्दामपणा अजिबात नाही.
विंदा करंदिकरांच्या कवितेत एका शब्दाचा बदल करुन सांगतो.
देता, देता इतुके द्यावे ...
देणाºयाने ‘रामशेठ’ व्हावे...
Comments
Post a Comment