मांगरूळ येथे गावात बाहेरील कोणी येऊ नये म्हणून रात्रंदिवस खडा पहारा देणारे विविध मंडळांचे कार्यकर्ते

मनोजकुमार मस्के :पुण्यनगरी  वृत्तसेवा  
 मांगरूळः येथे गावात बाहेरील कोणी येऊ नये म्हणून रात्रंदिवस खडा पहारा देणारे विविध मंडळांचे कार्यकर्ते
चिखली, ता.5: मांगरूळ ( ता.शिराळा) येथे कोरोनाच्या लढाईसाठी तरुण मंडळे गावचे रक्षक व स्वछता दूत बनले आहेत. त्यांचा आदर्श इतर गावातील विविध मंडळांनी घेतला तर आपण कोरोनला सहज हरवू शकतो.
 शिराळा कोकरूड रोडवरती मांगरूळ  हे गाव. या गावात सार्वजनिक कामांसाठी येथील गणेश मंडळे नेहनीच अग्रेसर असतात.  गावोगावी गणेशोत्सव, दुर्गाउत्सव,  व युवा मंडळे असतात. त्या माध्यमातून विविध सण व उत्सव साजरे केले जातात. त्यासाठी काहीवेळा अनाठायी खर्च ही केला जातो. गावातच एकमेकांच्या कार्यक्रमासाठी चढाओढ असते. त्यात आपलेच मंडळ सरस असावे असे प्रत्येकाचे मत असते. पण आपल्या गावावर संकट आले तर त्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून आपण एकच आहोत हे समजून एकत्र येणारी काही मंडळे असतात.त्या पैकीच  एक मांगरूळ येथील
शिवतेज गणेश मित्र मंडळ, न्यू  गणेश मित्र मंडळ जांभेवस्ती , ज्योतील्रिंग गणेश मंडळ खवरे वस्ती , शिवशक्ती गणेश मित्र  मंडळ,  श्री  गणेश मित्र मंडळ(माळवाडा), युवक शेणवी गणेश मित्र मंडळ, साई गणेश मित्र मंडळ, वारणा गणेश मित्र मंडळ (माळवाडा), विश्वरत्न मित्र मंडळ नालंदानगर , नवतरुणगणेश मित्र मंडळ मोरेवाडी, चिंचेश्वर गणेश मित्र मंडळ मांगरुळ , नवचैतन्य गणेश मित्र मंडळ राजे शिवाजी नगर, जय मल्हार गणेश मित्र मंडळ
 ही मंडळे आहेत. सर्वत्र कोरोनाचे संकट असल्याने आपल्या गावाची सुरक्षितता आपल्या खांद्यावर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
त्यांनी गेट तयार करून गावच्या चारी बाजुचे रस्ते बंद केले आहेत. त्या चारी कोपऱ्यावर प्रत्येक मंडळाचे पाच कार्यकर्ते आपल्या सोयीनुसार रात्रंदिवस खडा पहारा देत आहे. काही मंडळांनी तर मुख्य रस्त्यावर कोरोना रांगोळीच्या माध्यमातुन संदेश दिला आहे.      गावात भाजीपाला टंचाई भासू नये म्हणून भाजीविक्रीसाठी गावातील व्यक्तीलाच परवानगी दिली आहे. दूध गाडी व अत्यावश्यक सेवा यांनाच फक्त परवानगी  दिली जात आहे. मंडळाचे कार्यकर्ते एवढ्यावर न थांबता व ग्रामपंचायत वर अवलंबून न रहाता मंडळा मार्फत गावची स्वच्छता करत आहेत. गावच्या एकीने गावात बाहेरून येणाऱ्यांना ही धास्ती वाटत आहे. हा लॉक डाऊन कोरोना हद्दपार होऊ पर्यंत रहाणार आहे. या मंडळांच्या कार्यकर्त्यांना गावातील दानशुर मंडळी चहा,सरबत,लस्सी,बिस्किट वाटप करत आहेत. गावचे रक्षण करण्याचे काम मोठ्या उत्साहाने ही गणेश मंडळे करत आहेत. 

फोटो ओळ :- सुरक्षा रक्षकांना लस्सी देताना समाजसेवक भगवान मस्के व रांगोळीच्या माध्यमातुन दिलेला संदेश

Comments